बीड : बीडमध्ये घडलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग आणि विशेष पोलीस पथकाने न्यायालयात दोपारोपत्र सादर केले आहे. या अहवालात हत्येच्या कटाचा संपूर्ण पट उलगडण्यात आला आहे. आरोपींनी हा गुन्हा कसा घडवून आणला, कोणत्या बैठका झाल्या, कोणत्या कारणांमुळे हा कट रचला गेला, यासंबंधीचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.
संतोष देशमुख यांनी आवादा कंपनीच्या एका डीलमध्ये मध्यस्थी केली होती, जी पुढे फिस्कटली. याच कारणावरून वाद निर्माण झाला आणि अखेर हा वाद त्यांच्या निर्घृण हत्येपर्यंत जाऊन पोहोचला. पोलिसांच्या दोपारोपत्रानुसार, आरोपींनी विचारपूर्वक हा गुन्हा अंमलात आणला होता.
या प्रकरणात वाल्मिक कराडसह एकूण आठ जणांवर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या हत्येच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या सुदर्शन घुले याच्याबाबत पोलिसांनी नवीन माहिती समोर आणली आहे.
खंडणीसाठी वापरलेले सीमकार्ड ठरले महत्त्वाचे पुरावे
पोलिसांच्या तपासात असे आढळले की, सुदर्शन घुलेने खंडणी आणि इतर अवैध कामांसाठी एका परिचिताच्या नावावर सीमकार्ड खरेदी केले होते. याच सीमकार्डचा वापर करून तो लोकांना धमक्या देत असे. विशेष म्हणजे, गुन्हा घडवून आणताना वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्यासह त्याचे अनेक महत्त्वाचे संभाषण हे याच सीमकार्डवरून झाले होते.
पोलिसांच्या अहवालानुसार, या सीमकार्डच्या तपासणीमधून अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत, जे या गुन्ह्याचा मुख्य धागा उकलण्यासाठी उपयोगी ठरले आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आता पोलिसांच्या या तपास अहवालामुळे या गुन्ह्यामागची संपूर्ण पार्श्वभूमी स्पष्ट झाली आहे.

0 Comments